Advertisement

भुसावळात पाण्यासाठी ‘महाभारत’! पंचशील नगरमध्ये टँकरवर वाद; अनियमित पुरवठ्यामुळे नागरिक संतप्त

भुसावळ: भुसावळ शहरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालला आहे. अनेक भागांतील नागरिकांना पाण्यासाठी तीव्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
टँकर आल्यावर पाण्यासाठी झुंबड, नागरिकांमध्ये वाद
पाणीटंचाईची भीषणता इतकी वाढली आहे की, भुसावळ शहरातील पंचशील नगर परिसरात पाणीटँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. यावेळी आधी पाणी कोणी भरायचे, या क्रमावरून नागरिकांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या पाणीटंचाईमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली असून, महिलांना पाण्यासाठी तासन्‌तास रखरखत्या उन्हात प्रतीक्षा करावी लागत आहे.

रोजगारावर कुऱ्हाड; कामावर जाणाऱ्यांचे हाल
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात पाणीपुरवठ्याचे कोणतेही निश्चित वेळापत्रक राहिलेले नाही. त्यामुळे अनेक भागांतील रहिवाशांना संपूर्णपणे टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. काही ठिकाणी वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पाण्यासाठी खोळंबून राहावे लागत असल्याने रोजंदारीवर आणि कामावर जाणाऱ्या नोकरदारांच्या रोजगारावर याचा थेट परिणाम होत आहे.
नियोजनबद्ध पाणीपुरवठ्याची मागणी
भुसावळकरांनी प्रशासनाकडे नियमित, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा करण्याची आग्रही मागणी केली आहे. तसेच टँकरद्वारे पाणी वाटप करताना प्रशासनाने योग्य व्यवस्थापन व समन्वय ठेवावा, जेणेकरून नागरिकांमध्ये पाण्यासाठी वाद निर्माण होणार नाहीत, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. आता यावर प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Darpaan Jagat