पाचोरा:गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या पाचोरा शहर आणि परिसराला अखेर गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाने दिलासा दिला. मुसळधार सरींमुळे हवेत अचानक गारवा निर्माण झाला असून, उष्णतेपासून नागरिकांची सुटका झाली आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गातही कमालीचे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, पावसाचे आगमन होताच पाचोरा शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा, हवेत गारवा
गेल्या काही दिवसांपासून पाचोऱ्यात तापमानाचा पारा वाढल्याने नागरिक घामाघूम झाले होते. आज दुपारी झालेल्या अचानक आणि दमदार पावसामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला असून संपूर्ण परिसर प्रसन्न झाला आहे. या पावसामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना गती मिळणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.
महावितरणचा लपंडाव सुरू; नागरिक संतापले
एकीकडे पावसाने गारवा आणला असला, तरी महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाचा पहिला थेंब पडताच शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा गुल झाला. वारंवार वीज खंडित होत असल्याने घरगुती कामे ठप्प झाली आहेत. तसेच व्यापारी वर्गाचे व्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा मोठा परिणाम होत आहे.
तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे केल्याचा दावा केला जातो. मात्र, पहिल्याच पावसात पाचोऱ्यातील वीज यंत्रणेचे धिंडवडे निघाल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महावितरणने पावसाळ्याच्या दिवसांत अखंडित वीजपुरवठा करावा आणि नादुरुस्त यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आता पाचोरावासीयांकडून केली जात आहे.












